Eknath Shinde : आम्ही विश्वास ठेवला, पण भाजपने विश्वासघात केला, महायुती तुटली, आता थेट लढत… शिंदेंच्या मंत्र्याची मोठी माहिती
‘भाजपच्या हट्टामुळे आणि आग्रही भूमिकेमुळे छत्रपती संभाजीनगरमधील महायुती अखेर तुटली आहे. आम्ही विश्वास ठेवला, पण भाजपने विश्वासघात केला,’ अशा तिखट शब्दांत राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. जिल्ह्यातील जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी आता थेट संघर्ष सुरू झाला असून, येथे मैत्रीपूर्ण नव्हे तर ‘थेट लढत’ होणार असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पातळीवर भाजपचा ‘कट’
संभाजीनगरमध्ये युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर आम्ही बैठका घेतल्या, स्थानिक कार्यकर्ते वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले, आधीच शंका आली होती, मी दरवेळी स्थानिक नेत्यांना फोन करून बैठका केल्या, बावनकुळे यांच्याबरोबर देखील बैठक झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर जागा वाटप ठरलं. त्यावेळी युती झाली या संभ्रमात होतो. मात्र ज्यावेळी जागा द्यायची तेव्हा शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील असा प्रस्ताव दिला. दुसरीकडे युतीच्या चर्चा होत्या. या घडीला सुद्धा कोणताही नवीन प्रस्ताव दिला नाही, आग्रही भूमिकेला तडा दिला, अशा भाषेत शिरसाट यांनी भाजपवर टीका केली आहे.
‘स्थानिक नेत्यांना आवरा, अन्यथा उघड बोलेन’
निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अंधारात मुलाखती घेऊन गोंधळ निर्माण केल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. ‘कुठे कट शिजला, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. मला तोंड उघडायला लावू नका, स्थानिक नेत्यांना आवरा,’ असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.



