पालघर
पालघर – कचेरी रोडसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आता विक्राळ रूप धारण करत आहे. अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या, चुकीच्या ठिकाणी केलेले अवैध डिव्हायडर आणि रिक्षाचालकांची मनमानी यामुळे पालघरकरांचे हाल होत आहेत.
शहरातील गल्लीबोळ आधीच संकुचित; त्यात बेताल पार्किंगमुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. पालघर रेल्वे स्थानक परिसरात तर रिक्षाचालकांची मनमानी कायम असून, चुकीची पार्किंग व अव्यवस्थित वाहतुकीमुळे प्रवाशांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागते.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलीस ठिकठिकाणी दिसत असले तरी नियम अंमलबजावणीमध्ये गंभीर त्रुटी आहेत. वाहतूक नियंत्रण, अवैध पार्किंग व बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करण्याची तीव्र गरज आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना, पोलिसांची संख्या व बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी नागरिक सातत्याने करत आहेत.
नागरिकांची ठाम मागणी
रस्त्यांवरील अवैध डिव्हायडर तात्काळ हटवावेत.
चुकीच्या ठिकाणी होणारे बेताल पार्किंग रोखावे.
रिक्षाचालकांवर कडक शिस्त लावावी.
ट्रॅफिक पोलिसांची संख्या वाढवून कठोर अंमलबजावणी करावी. पालघरकरांना आज रस्त्यांवरून सुरळीत प्रवास करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अपुऱ्या नियोजनामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाने ठोस उपाययोजना करून वाहतूक शिस्त प्रस्थापित करावी, हीच पालघरकरांची अपेक्षा आहे



