चारोटी उड्डाण पुलावर मृत्यूचा सापळा
NH-48 मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील गंभीर निष्काळजीपणा
पालघर :
चारोटी उड्डाण पुलावर NHAI ठेकेदाराच्या गंभीर निष्काळजीपणामुळे महामार्ग प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे. पुलावर व पुलाच्या आसपास अनेक वेळा बंद, नादुरुस्त वाहने कोणतीही सेफ्टी, रिफ्लेक्टर, बॅरिकेड किंवा चेतावणी फलक न लावता तासन्तास उभी राहत असल्याचे चित्र वारंवार दिसत आहे.
इतक्या धोकादायक ठिकाणी उभी असलेली वाहने महामार्ग पेट्रोलिंग टीम व वाहतूक पोलिसांना दिसत नाहीत का? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, चारोटी टोल नाक्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर चार तासांहून अधिक काळ बंद पडलेले वाहन हटवण्यात आले नाही, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.
या संपूर्ण प्रकारावर इद्रिस सोलंकी यांनी आपत्ती व्यक्त करत 48 हायवेवरील गंभीर लापरवाहीचा व्हिडिओद्वारे खुलासा केला आहे. त्यांच्या व्हिडिओतून NHAI ठेकेदार, महामार्ग पेट्रोलिंग टीम आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष स्पष्टपणे समोर आले आहे.
या उड्डाण पुलाजवळच चारोटी महामार्ग वाहतूक पोलीस चौकी असतानाही, प्रत्यक्षात मात्र महामार्गावर मदतीऐवजी RTO चेकपोस्ट व टोल नाक्यांवर वसुलीवरच अधिक भर दिला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा “टार्गेट” पूर्ण करणे महत्त्वाचे झाले आहे का, असा संतप्त सवाल जनतेकडून केला जात आहे.
या ठिकाणी कधीही मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे NHAI, महामार्ग वाहतूक पोलीस आणि संबंधित ठेकेदारांनी तात्काळ जबाबदारी घ्यावी, बंद पडलेली वाहने त्वरित हटवावीत आणि आवश्यक सेफ्टी उपाय लागू करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा हा महामार्ग खऱ्या अर्थाने “मृत्यूचा सापळा” ठरणार, हे नक्की.
✍️ जावेद मजीद लुलनिया.
भाजपा प्रणित – नव भारतीय शिव वाहतूक संघटना
पालघर जिल्हा अध्यक्ष, पालघर.
संपादक – पालघर नागरिक.
NH-48 हायवे इन्फॉर्मेशन ग्रुप, पालघर…



