समता, न्याय आणि विकासाचा संदेश देणारा ‘सामाजिक समता सप्ताह उत्साहात प्रारंभ

समता, न्याय आणि विकासाचा संदेश देणारा ‘सामाजिक समता सप्ताह उत्साहात प्रारंभ

पालघर, दि. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समतामूलक समाजरचना घडविण्याचा दिलेला संदेश आजही मार्गदर्शक ठरत आहे. राज्यघटनेतील कलम ४६ द्वारे दुर्बल व वंचित घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनाची जबाबदारी राज्यावर सोपविण्यात आली असून, या तत्वांच्या अंमलबजावणीसाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.


याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, पालघर जिल्ह्यात या उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात झाला.जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.’


जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सर्व विभागांना आपल्या अधिनस्त कार्यालयांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. तसेच दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या विविध कृतींचे आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


कार्यक्रमास डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे यांच्या मार्फत सर्व मान्यवरांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमास वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *