रस्त्याचे रस्ताच उरले नाही! शिगाव-खुताड ग्रामपंचायत अंतर्गत वाणी पाडा परिसरातील नागरिकांचा संताप

विकासाच्या नावाखाली खड्ड्यांचा कारभार!” — वाणी पाडा रस्त्याने ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट व्यवस्थेचे केले नागडे प्रदर्शन

प्रतिक मयेकर,पालघर

बोईसर| शिगाव-खुताड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाणी पाडा परिसरातील रस्ता आज खड्ड्यांमध्ये पूर्णपणे गाडला गेला आहे. एखाद्या तालुक्याच्या नव्हे तर एखाद्या विस्मृतीत गेलेल्या गावाच्या दुर्दशेचं चित्र इथे पाहायला मिळतं. रस्त्याचं डांबरीकरण झालं, असं कागदावर दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात जमिनीवर खड्डेच खड्डे. शिगाव खुताड-वाणी पाडा या छोट्याशा अंतरावर वाहन चालवणं म्हणजे जणू खड्ड्यांच्या समुद्रात नौकानयन करणं. लाखो रुपयांचा निधी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च होतो, पण तो निधी नागरिकांच्या सोयीसाठी जातो की ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या खिशात, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

गावातील लोकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्यावर पाऊल टाकलं की चिखल उडतो, खड्ड्यांत पाणी साचलेलं असतं, आणि थोडा पाऊस झाला की रस्ता वाहून गेला की काय अशी अवस्था निर्माण होते. दोन चाकी वाहनं चालवताना चालकांना समतोल राखणं कठीण होतं. शाळकरी मुले पावसात चिखलात चालतात, वृद्ध लोकं घराबाहेर पडायलाही घाबरतात, आणि रुग्णवाहिका तर या रस्त्यावरून जाणं म्हणजे एखाद्या जीवाशी खेळणं ठरतं. हा रस्ता फक्त खराब नाही तर धोकादायक बनला आहे, आणि ग्रामपंचायतीकडून मात्र ‘सुधारणेचं आश्वासन’ मिळतं — तेही वर्षानुवर्षं.

 रस्त्याचं डांबरीकरण झाल्याचा दावा गेल्या वर्षी करण्यात आला होता. परंतु काही दिवसातच ते डांबर उखडून गेलं. पावसाचं कारण देत ठेकेदार गायब झाला आणि ग्रामपंचायत गप्प बसली. खड्डे वाढले, त्रास वाढला, पण जबाबदार मात्र दिसले नाहीत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून काम केलं, आणि ग्रामपंचायतीने त्यावर कोणतीही चौकशी केली नाही. उलट, बिल पास करून प्रकरण दाबलं गेलं. या मिलीभगतीमुळे ग्रामपंचायतीतील कारभार पारदर्शक नसून भ्रष्टाचाराचं सावट असल्याचं नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत.

रस्त्याची स्थिती एवढी बिकट आहे की काही ठिकाणी खड्डे एवढे खोल झाले आहेत की त्यात लहान मुलं पडण्याची शक्यताही आहे. पावसात तर रस्त्याचं आणि पाण्याचं फरक ओळखणंही कठीण होतं. या सगळ्या प्रकारामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. “रस्ता नसताना आम्हीच चुकतो, आणि ग्रामपंचायत व ठेकेदार मात्र निर्दोष राहतात,” असा रोष लोकांत आहे.

ग्रामपंचायतीतील अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमत आता लपून राहिलेलं नाही. जनतेच्या पैशावर चालणारा हा भ्रष्टाचार प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप या रस्त्याची पाहणी केलेली नाही, आणि ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केलं आहे. नागरिक म्हणतात की, “खड्डे आम्ही भरतो, पण त्यांच्या खिशातले खड्डे भरायला आम्ही सक्षम नाही.” हा रस्ता पाहिला की एकच गोष्ट स्पष्ट होते — ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे केवळ निवडणुकीपूर्वी आश्वासने आणि निवडणुकीनंतर मौन.

 

आज वाणी पाडा परिसरातील रस्ता हा ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभाराचा आरसा ठरला आहे. विकासाच्या नावाखाली फक्त खड्डे, फोटोसेशन आणि निवडणूक काळात आश्वासने — एवढंच वास्तव उरलं आहे. नागरिक आता प्रश्न विचारत आहेत, “हीच का ती खड्डेमुक्त भारताची घोषणा? आणि या खड्ड्यांत गाडला जाणारा आमचा विश्वास कोण उचलणार?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *